पत्रकारांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न !

जालना  -  कधी पत्रकारांवर थेट हल्ले करून,कधी व्यवस्थापनाचे कान फुंकून,तर कधी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा सातत्यानं प्रयत्न होत असतो.जालन्यात असाच प्रयत्न झाला आहे.जालन्यातील उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके यांनी  'काही पत्रकारांनी आपणास खंडणी मागितल्याची   पोलिसात तक्रार दिली आहे.त्यावरून एका दैनिकाच्या संपादकांसह,एका वाहिनीच्या प्रतिनिधी आणि संपादकांच्या विरोधात भादवि कलम 207,385,500,501,534 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान ही घटना 3 एप्रिलची 2016 ची आहे. या दिवशी शहरातील एका हॉटेलात 'रंगारंग पार्टी' झाली होती. त्यात काहींनी 'ठेकाही' धरला होता.त्यात काही वरिष्ठ अधिकार्‍यांचाही समावेश होता.ही बातमी जूनमध्ये पत्रकारांना समजली.त्यावरून स्थानिक दैनिक दुनियादारीमध्ये 20 जूनच्या अंकात ती प्रसिध्द झाली टीव्ही-9,महाराष्ट्र वन वरही चित्रफितीसह बातमी प्रसिध्द झाली आहे.या बातमीत कुणाचे नाव नसले तरी अधिकारी कोण होते ते समोर आले.बातमीमुळे आपण अडचणीत येऊ शकतो याची जाणीव होताच पोलिसात तक्रार दिली गेली आहे.त्यावरून गुन्हा दाखल झाला .
या संदर्भात आज जालना येथील पत्रकारांनी जिल्हा पोलिस प्रमुख श्री.माकणीकर यांची भेट घेऊन अगोदर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करूनच कारवाई करावी अशी मागणी केली आहे.पोलिस प्रमुखांना दिलेल्या निवेदनात आपले बिंग फुटल्यामुळेच पत्रकारांना अद्दल घडविण्याच्या इराध्यानं खोटी तक्रार देण्यात आल्याचे म्हटले आहे.हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील घाला असून पत्रकाराचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.सत्य बातमी देणे हा गुन्हा नाही.जी बातमी दिली गेली ती पुराव्यासह आणि चित्रफितीच्या आधारे दिली आहे.त्यामुळे हा गुन्हा होत नाही.त्यामुळे या प्रकरणात हेतुतः गोवण्यात आलेल्या संपादक,पत्रक ारांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. पोलिस प्रमुखांना भेटावयास गेलेल्या शिष्टमंडळात शहरातील सर्व दैनिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.