दिव्य मराठीची वाटचाल रखडली!

औरंगाबाद  - मोठ्या प्रमाणात झालेली भांडवली गुंतवणूक व बाजारपेठेतून घटलेले उत्पन्न यामुळे दैनिक दिव्यमराठीच्या विस्तारीकरणाची वाटचाल रखडली आहे. दिव्यचे औरंगाबाद युनीट सद्या तोट्यात चालत असून, प्रशासकीय खर्च वाढलेला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील स्थिती सुधारली नाही तर आणखी कॉस्ट कटिंग केल्याशिवाय व्यवस्थापनाला पर्याय राहणार नाही. पुणे व कोल्हापूर आवृत्ती सुरु करण्याचेही नियोजित होते. परंतु, बाजारपेठेची स्थिती चांगली नसल्याने या आवृत्त्यांबाबतही व्यवस्थापन काहीही निर्णय घेण्यास तयार नाही.

महाराष्ट्र संपादक अभिलाष खांडेकर यांनी माणसे भरताना गुणवत्तेपेक्षा जातीचा निकष लावल्याचा फटकाही दैनिकाला बसला. याच जागी बहुजन समाजातील गुणवान माणसे नियुक्त केली असती तर व्यावसायिक फटका बसला नसता. सद्या कॉर्पोरेट बिझनेस दैनिकाकडे येत असून, लोकल बिझनेस नसल्यात  जमा आहे. नगर, अकोला, नाशिक आणि फादर एडिशन असलेली औरंगाबाद आवृत्तीही मंदीच्या मार्‍यात सापडलेली आहे. त्यामुळेच पुणे अन् कोल्हापूर आवृत्या सुरु करण्यात व्यवस्थापन टाळाटाळ करत आहे. महाराष्ट्र टाईम्सने ज्याप्रमाणे आपलेच जातभाई पोसण्यासाठी बहुजनांची गुणवंत माणसे टाळली. तोच कित्ता दिव्यमध्ये खांडेकर यांनी राबविला. परिणामी, मटाप्रमाणेच दिव्यदेखील प्रत्येक ठिकाणी सपशेल अपयशी ठरले आहे. ही बाब व्यावसायिक मेंदू असलेल्या अग्रवाल शेठच्या पचनी पडत नाही. पुणे आवृत्ती ही व्यावसायिक फायद्याची ठरणारी असेल असे सल्लागार संपादकांनी व्यवस्थापनाला समजावून सांगूनही दुधाने तोंड पोळलेले व्यवस्थापन आता ताकही फुंकून पित आहे.

दिव्य मराठी औरंगाबादेत सुरू होवून पाच वर्षे होत आहेत.ही होम आवृत्ती असूनही मराठवाड्यातील नांदेड,परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यात  अंक नाही.सोलापूरला आवृत्ती सुरू झाल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कसाबसा अंक सुरू आहे.मराठवाड्यात क्रमांक एकवर लोकमत, पुण्यनगरी क्रमांक दोनवर आहे.सकाळ आणि दिव्य मराठीमध्ये क्रमांक तीनसाठी स्पर्धा सुरू आहे.
नगर शहरात अंक असला तरी नगर जिल्ह्यात अजून अंक पोहचला नाही.नगर आवृत्तीचे तीन तेरा वाजले आहेत.
अकोला आवृत्ती सलाईनवर आहे.तेथील सिटी न्यूज सुपरफास्ट दैनिक सुध्दा दिव्य मराठीपेक्षा जास्त खपते.सोलापूर आवृत्ती जिल्हापुरती सिमीत आहे.युनिट हेड आणि निवासी संपादकांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.सोलापुरात स्थानिक दैनिक सुराज्यसुध्दा दिव्य मराठीपेक्षा पुढे आहे.
जळगाव आणि नाशिक आवृत्तीची तिच बोंब आहे.त्यामुळेच भोपाळसेठ पुढील आवृत्ती काढण्याबाबत संभ्रमावस्थेत आहेत.
नागपुरात किती तरी दैनिके आली आणि गेली पण लोकमत क्रमांक एकवर आहे.त्यामुळे दिव्य मराठीला नागपुरात पाय ठेवणे सोपे नाही.कोल्हापुरात पद्श्रीचा पुढारी क्रमांक एकवर आहे.लोकमतच्या दर्डाशेठला पद्श्रींनी कोल्हापुरात पाणी पाजले तिथे भोपाळशेठला मैदान सोपे नाही.पुण्यात क्रमांक एक वर सकाळ आहे.सकाळला पुण्यात शह देणे सोपे नाही.मुंबईत अनेक दैनिकांची वाट लागली आहे.तिथे काम सोपे नाही.अश्या परिस्थितीत भोपाळशेठला पुढच्या आवृत्त्या सुरू करताना मागचा पुढचा विचार करावा लागणार आहे.